शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

आई

***जाणीव झाली मला,*
*स्वतः बनल्यावर मी आई,*

९ महीने उदरात तुझ्या,
वाढले मी आई,
किती त्रास तुला,
झाला असेल आई,
खरंच किती ग्रेट,
आहेस तू आई,
जाणीव झाली मला,
स्वतः बनल्यावर मी आई..

कळा किती तू ,
सोसल्या ग आई,
मला किती तू,
जपले ग आई,
जन्माआधिपासून प्रेम,
केलेस तू आई,
जाणीव झाली मला,
स्वतः बनल्यावर मी आई..

मुलगा-मुलगीत तुला,
रस नव्हता आई,
सुदृढ़ बाळासाठी तुझा,
हट्ट होता आई,
जखमेच्या वेदना तुला,
झाल्या असतील आई,
जाणीव झाली मला,
स्वतः बनल्यावर मी आई,

ईश्वराच अंश तू,
आहेस गं आई,
मायेचा सागर तू,
आहेस गं आई,
कुटुंबाचा आधार तू,
आहेस गं आई,
जाणीव झाली मला,

फरक


_नेमकं साध्य आणि साधन यातील फरक ओळखता न आल्याने आपली गफलत होत आहे._
_आपण आयुष्य जगण्यासाठी काम करत होतो हे विसरून काम करण्यासाठी आयुष्य जगत आहे अशी परिस्थिती होऊन जाते.._
_नुकतेच राज्य सरकारने पहिला व तिसरा शनिवार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुटी म्हणून जाहीर केलेला आहे पण यांमुळे जबाबदारी देखील अधिक वाढली आहे..._


वाढले कामाचे तास,
प्रवास नाही सोपा,

थोडा वेळ देऊन,
आपल्या तब्येतीला जपा..

सोमवार ते शुक्रवार,
उत्साहात काम करा,
शनिवार आणि रविवार,
मस्त आराम करा..

इमाने-इतबारे,
कामे वेळेत करा,
स्वतःची असतील काही,
ती सुटीत करा..

ग्राहकांच्या सेवेला,
प्रथम स्थानी ठेवा,
पण ऑफिस आणि घर,
दोन्ही स्वतंत्र ठेवा..

साध्य आणि साधन,
फरक यातील ओळखा,
तान-तणावचा,
उतरून टाका बुरखा....

माझी लहान मुलगीे...

माझी लहान मुलगी ऊर्जा हिला तिची आई इंग्रजीतून ओळख करून देते तर त्याच गोष्टीची ओळख मी मराठीतून करून देतो..
बोलणं शिकण्याच्या वयापासूनच मुलीला एकाच शब्दांसाठी दोन भिन्न शब्द शिकवले जात असल्याने नेमका तिचा संभ्रम वाढू शकतो..
या विषयावरची मी केलेली ही कविता...

ती शिकवते पिग,



मी शिकवतो डुक्कर,
इंग्रजी मराठीच्या नादात,
पोरीला येतोय चक्कर..

ती शिकवते फॅन,
मी सांगतो पंखा,
नेमकं काय म्हणावं ?
पोरीला येते शंका..

दीड वर्षाच्या पोरीला,
शब्दांची ओळख पटवतो,
ती सांगते इंग्रजीत,
तर मी मराठीत शिकवतो.

एकाच गोष्टीची तिला,
पर्यायी नावे सांगतो,
यामुळेच बहुदा तिचा,
बोलण्याचा प्रयत्न लांबतो..

इंग्रजी-मराठीच घरातं,
चालू असते फ्युजन,
दिवसेंदिवस वाढतंय,
पोरीचं कन्फ्युजन..

मला तरी वाटतंय,
आधी मराठीतच शिकवावं,
मातृभाषेचे बीज आपलं,
बालपणीचं रुजवावं...


शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

आज तर तिने मला , वेड्यातच काढले!!



आज तर तिने मला ,
वेड्यातच काढले!!

ती म्हणाली माझ्यावर,
किती प्रेम करतोस?
मी म्हटले खूप खूप,
आभाळाएवढं करतो?

उत्साहित होत ती म्हणाली,
सांग माझ्यासाठी तू,
काय करू शकतोस?
मी म्हटलं,
राणी बनवून तुला,
सुखी ठेवू शकतो?

ती अधिक आनंदित होत म्हणाली,
खरंच असं होईल का?
अंग म्हटलं हो,
अगदी तुझ्या गळ्याची शप्पथ.

हात माझा हातात घेत,
ती भावविश्वात रमली,
किती मजा असेल न!,
हरपून भान बोलली..

आपला सुखी संसार,
तू राजा अन मी राणी,
आपल्याशिवाय नसेल तिथे,
अजून दुसरं कुणी..

मधेच हातातील हात काढून,
तिला थांबवत म्हटलं,
काय म्हणालीस?
ती एकदम थबकली,
अन म्हणाली,
राजा, माझं काही चुकलं का?
मी म्हणालो,
तू आता काय बोललीस?
पुन्हा जरा सांगशील का?

थोडं दबकतच म्हणाली ती,
तू राजा अन मी राणी...
मी म्हणालो,
पुढे काय बोललीस?
पुढे?
आपल्याशिवाय नसेल तिथे,
अजून दुसरं कुणी..

हा.
सखे इथेच तर तू चुकलीस..

जीवापाड माझं सखे,
तुझ्यावर प्रेम आहे,
तुझ्यासाठी काहीही करू शकेल,
एवढं धैर्य देखील आहे..

पण का म्हणून सोडू मी,
ज्यांनी जन्म दिला मला,
आणि थोडा पण विचार तु,
ना बोलण्याआधी केला...

जन्मलो नव्हतो जरी मी,
त्यांनी प्रेम मला केलंय,
चालणं, बोलणं शिकवून,
स्वतःच्या पायावर उभं केलंय..

सांग तुझ्यासाठी मी,
त्यांना कस सोडू ?
स्वप्न त्यांची मोडून,
तुझ्याशी संसार कसा थाटू?

ते होती म्हणूनच तर,
तुझी माझी भेट झाली,
त्यांच्याविना संसाराची,
डोक्यात कल्पनाच कशी आली?

माफ करा मला,
मी तुझ्यासाठी,
काहीही करू शकणार,
पण आईबाबांना सोडून,
तुझ्यासोबत नाही राहू शकणार..

भलेही मी आजन्म,
लग्न करणार नाही,
प्रेम आहे तुझ्यावरच,
दुसरीवर करणार नाही..

आजही माझं तुझ्यावर,
तेवढंच प्रेम आहे,
पण तुझ्यापेक्षा थोडं अधिक,
त्या दैवतावर आहे.

उदास न होता तिचा,
निरोप मी घेतला,
प्रेमाचा गुंता कसा,
एका क्षणात सुटला...

माझ्या तशा वागण्याने,
ती बुचकळ्यातच पडली,
तिच्या मनातली भावना,
मला आपसूकच कळली..

चेहऱ्याकडे बघत तिच्या,
मीच तिला बोललो,
अगं, वेडे
बर झालंस तू मला,
लग्नाआधीच सांगितलं,
घटस्फोट होण्यापासून,
आपलं आयुष्य तर बचावलं.


गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

आपल्या धेय्यांवर प्रेम करा...*



*आपल्या धेय्यांवर प्रेम करा...*

आज एका मित्राची कविता वाचली. त्यात त्याने आपल्या प्रेयसीला भेटण्याबद्दलची, तिच्याविषयी असलेल्या प्रेमाबद्दलची तळमळ, कळकळ शब्दांतून प्रकट केली.
सहावर्षांचा प्रदीर्घ असा काळ. किमान एकदा तरी तिची भेट व्हावी, तिचं आरसपाणी सौंदर्य एकदा तरी डोळ्यांत साठवता यावं यासाठी तब्बल पंचवीस वेळा त्याने तिला आज मनाशी पक्क ठरवून फोन लावला. तिने त्यावर साधा रिप्लाय पण दिला नाही. शेवटी ब्रम्हास्त्र काढावं आणि प्रत्यंच्या खेचून मनात काहीतरी मंत्र पुटपटावे तसे त्याने शेवटचा कॉल केला आणि यावेळी नेमका तिने फोन उचलला.
मला तुला भेटायचे आहे. तिने नकार दिला.. माझ्याशी बोलू नकोस पण मला एकदा तुला फक्त बघायचे आहे. मी दुरूनच बघणार पण प्लिज एकदा तरी भेट.
शेवटी त्याची विनवणी-गयावया मान्य करीत ती तिच्या घराबाहेर मैत्रिणीसोबत नाश्ता करण्याच्या निमित्ताने आली.
एखाद्या अतृप्त आत्म्याप्रमाणे तो तिला डोळ्यात साठवत होता, गाडीवर बसून दुरूनच तिला बघत होता.
बऱ्याच वर्षांनंतरची तीची ही भेट होती.
जणू काही शेवटची भेट असल्याप्रमाणे तो तिला पाहत होता.
आज तो खुप खुश होता ती एक शब्द ही न बोलता तिथून निघून गेली. साधा एक कॉल पण तिने नंतर केला नाही..
पण हा आज रात्रभर झोपला नाही.. ते स्वप्न, तो चेहरा त्याला झोपू देत नव्हता. त्याच्या पोटात अन्नाचा एक कण पण नव्हता, त्याला अन्न सुद्धा गोड लागत नव्हते..
किती प्रेम नि किती प्रेम.. तो प्रेमवेडा झाला होता, त्याचे मन कशातही लागत नव्हते.. त्याला स्वस्थ बसू देत नव्हते..
बस्स हीच तळमळ, हीच कळकळ आपल्या ध्येयाविषयी असली की आपण धेय्यापासून दूर असूंच शकत नाही. ज्याप्रमाणे तो तरुण प्रेमवेडा होता तसा तो धेय्यवेडा झाला की, यश त्याला मिठी मारायला तयार असते.
_पण शोकांतिका ही आहे की आपण ज्यावेळी ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे ते न केल्याने आपल्या पदरी निराशा राहते किंवा जे मिळवण्याची आपली लायकी होती त्यापेक्षा कमीवर समाधानी राहावं लागतं._

सलग पंचवीस कॉल, तिला केलेल्या विनवण्या हीच तळमळ आपल्या धेय्याशी असली, आपल्या प्रयत्नांचा एवढा पाठपुरावा आपण धेय्याशी केला की धेय्य गाठणे सहज शक्य होते.
प्रत्येक युवकांमध्ये ती तळमळ ती कळकळ असतेच, फक्त नेमके जिथं प्रयत्न करायला हवे, ज्या वयात करायला पाहिजे तिथे आणि तेव्हा केले जात नाही.

*आपल्यातील जिद्द, प्रयत्न अजूनही मेलेले नाहीत फक्त त्यांना डायव्हर्ट करण्याची गरज आहे, योग्य दिशा देण्याची गरज आहे.*

ज्याप्रमाणे तो तरुण प्रेमवेडा झाला, त्याला त्याच्या प्रेयसीशिवाय काहीच सुचत नव्हतं, रात्रभर झोप सुद्धा लागत नव्हती, अन्न पोटात घालायची इच्छा होत नव्हती.
अगदी त्याचप्रकारे जेव्हा तो धेय्यवेडा होतो तेव्हा त्याला सुद्धा धेय्य पूर्णकेल्याशिवाय चैन पडत नाही, अन्न गोड लागत नाही. 
ती ध्येय त्याला स्वस्थ बसूच देत नाही, रात्री झोपु देत नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी ध्येय्यचं दिसायला लागते आणि जेव्हा असे होते तेव्हा आपण धेय्याच्या मार्गाने यशस्वी मार्गक्रमण करीत आहोत असे समजावे. मरण सुद्धा त्यांच्यात अडसर ठरत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये.
यात जमेची बाजू म्हणजे धेय्य हे प्रेयसीप्रमाणे नसल्याने त्यांना  आपण आवडलो नाही किंवा आपण श्रीमंत नाही, आपली जात श्रेष्ठ नाही म्हणून कधीही नकार देणार नाही. जो तिथपर्यंत पोहचला धेय्य त्याचे झाले. धेय्य हे आहेत त्या जागी निश्चल पडलेले असतात. गरज असते फक्त आपल्याला त्या दिशेने जाण्याची, तिथपर्यंत पोहचण्याची. प्रत्येकाने खबरदारी एवढीच घ्यावी की आपण कुठे कमी पडू नये, मागे राहू नये.
एकदा का आपण धेंय्यांच्या प्रेमात पडलो की यशस्वी झालोच म्हणून समजा.

एक गोष्ट लक्षात असू द्या,
_जेव्हा अलार्म ऐवजी जबाबदारी, जाणीव आपल्याला झोपेतून उठवते तेव्हा आपण यशाची एक पायरी चढलेलो असतो._
_यशाच्या मार्गात परिस्थिती कधीच अडसर ठरत नाही, अडसर ठरते तर फक्त ती जिद्द_

_ज्यांच्या जिद्दीला लकवा मारलेला असतो यश त्यांना नेहमी चकवा देत असते.._

*तर चला आजपासूनच आपल्या धेय्यांच्या प्रेमात पडा, त्याच्याशी एकरूप व्हायला शिका आणि यशाला आलिंगण देण्यासाठी तयार व्हा..*

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

खास माह्या बायकोसाठी...*

*खास माह्या बायकोसाठी...*

ना चाकलेट आनलं कवा तिले,
ना देल्ला कधी टेडी,
तरी प्रेम करते थे,
हाय मीरे सारखी वेडी..

रुसनं फुगनं सारं तीचं,
तेवळ्यापुरतंच असते..
थे नसली घरात का,
घराले घरपन नसते..

प्रेमाचे चार शब्द तिले,
गुलाबापरी असतात,
यापेक्षा अपेक्षा तिच्या,
फार मोठ्या नसतात..

हाय फाय नसते डिमांड तिची,
राह्यते साधी सुधी,
येवळच प्रेम करीन थे,
झाली जरी बुढी..

कायजी असते बंबाट माही,
फोन रोज करते,
उलीसक बिमार पडलो का,
तिले कोसोदुरूनचं कयते..

आवाजावरून अंदाज तिले,
माह्या तब्येतीचा येते,
माय नंतर कायजी भाऊ,
तेच माही घेते..

घड्याळीचा काटा चुकीन,
पन थे नाई चुकत,
नोकरी करून करते थे,
समद्यायचं न थकत..

नशीब म्हनू का पुन म्हनू ?
माह्या पुरव जन्मीचं?
बायको म्हणून नातं तीचंच,
लाभो सात जन्मीचं.


सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

समाजाच्या काय तू कामी पडला.....

*समाजाच्या काय तू कामी पडला..?* 

'मान्य आहे शून्यातूनी ,
 तू  लयी वरती चढला..
'पण सांग तू गड्या
समाजाच्या काय कामी पडला...?


'धनामधली कोणासाठी
मोडली नाही काडी...
दरवर्षाला स्वतःसाठी ,
घेत गेला 'गाडी...
दिला नाही ' कांदा जरी
घरी तुझ्या सडला......
'सांग तू जरा   समाजाच्या काय तू कामी पडला....?

तुझा नित्त्य चढत आहे
मजल्यावरती 'मजला....
लहानपणीचा तुझाच 'यार '
ऊघड्यावरती निजला...!
तुझ्यामधला मित्र गड्या
सांग कुठे दडला...?
'सांग  तू जरा  समाजाच्या काय  कामी पडला...?

'गरिबीनं गांजलेली
 माणसं आला बघत...
तरीही तू आपल्याच आहे ,
 मस्तीमध्ये 'जगत....
तुझ्यावाचून नाही जरी
संसार त्यांचा 'अडला...
पण सांग तू जरा  समाजाच्या काय
कामी पडला...?"


'जन्मल्या त्या समाजाचा
 जरा ऋणी राह्य तू....
'मागे राह्यल्या समाजाला ,
मागे वळून पाह्य तू...
कोणी नाही पुसत ऊद्या ,
तू  कितीही 'मोठा घडला...
सांग तू  जरा  समाजाच्या काय कामी पडला..?


🌹🌹🌹🌷🌷🌷🌹🌹

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

काहीतरी तिला सांगायचं होतं*


_ज्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण बोलू शकले नाहीत अशा सर्वांसाठी.._

*काहीतरी तिला सांगायचं होतं*


मनातलं आज बोलायचं होतं,
काहीतरी तिला सांगायचं होतं,

काळ्याकुट्ट मेघांनी,
जसं आभाळ भरून यावं,
तसं सर्व माझ्या ओठांपर्यंत आलेलं..

जणू वाटायचं,
आता नुसतं मेघ ,
धो-धो कोसळणार आहे..
मनातलं सार काही गुपित,
तिला आज सांगणार आहे..

पण व्हायचं ते भलतंच,

समोर येताच क्षणी ती,
मेघांची गर्दी अचानक नाहीशी व्हावी,
आणि भरलेलं आभाळ निरभ्र व्हावं,
अगदी तसंच बोलायचं ते,
विसरून जायचो..

देव जाणे कशी तेव्हा,
बोबडी माझी वळायची..
पाठीमागे लपवलेली,
फुले अकस्मात गळायची..

महारथी कर्णाला जसे रणांगणार,
अंतसमयी, अटीतटीच्या वेळी, विद्येची विस्मृती झाली होती..
अगदी तशीच विस्मृती, तिच्यासमोर असतांना माझी व्हायची..

रटलेलं, लिहलेलं, ठरवलेलं,
दडवलेलं सारं जागीच थिजून जायचं.

हे असंच चालू होतं..

अशातच माझे,
दिवसच नव्हे तर वर्ष निघून गेली,
मनातली गोष्ट मनात दबून गेली..

ना ती कधी बोलली,
ना मी कधी बोललो,
पण विरहात मात्र दोघेही,
कायमस्वरूपी जळलो..

वाटतंय कुठेतरी मनाला,
जर कदाचित तेव्हा तिला,
सारं काही सांगून दिलं असतं,
मनावरचं ओझं तरी,
आयुष्यभरासाठी हलकं झालं असतं..



*Happy Propose Day*

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

रोझ_डे निमित्त केलेली रचना आपल्यासाठी

#रोझ_डे निमित्त केलेली रचना आपल्यासाठी

पहाटेला उठुनी लवकर,
तयारीशी लागलो झटपट,
आई म्हणाली घाई कसली?
पाहुनी माझी ती लगबग..

अग आज रोझ डे,
लवकर कॉलेजात जायचंय,
आपल्या प्रिय व्यक्तीला,
एक एक रोझ द्यायचंय..

आई म्हणाली सर्वच,
सारखेच असतात डे,
तिला म्हणालो तसं नाही,
थोडा वेगळा असतो हा "डे".

फुले तोडण्या  गुलाबाची,
पटकन मी बागेत गेलो,
फुले नसल्याचे पाहूनी एकदम,
आईवरती फिरलो..

बागेतील फुले गुलाबाची,
सांग कुणी तोडली ?
आठवड्यांपासुनी ज्याची सतत,
निगराणी मी केली.

आता कोठून आणू फुले,
सांग तू वेळेवरती,
रागानेच भडकलो मी,
त्या प्रेमळ माऊलींवरती...

स्मित करुनी आई म्हणाली,
मीच ती फुले तोडली,
माझ्या प्रिय देवांस,
त्यापैकी वाहिली..

"रोझ डे" म्हणुनी काही,
तुजसाठीही ठेवली,
तोडल्यापैकी काहीच फक्त,
देवांस मी वाहिली..

तशीच ती फुले घेतली,
व्यवस्थित बॅगेत भरली,
गाडीला किक मारली
अन वाट कॉलेजची धरली..

अर्ध्या वाटेत जाता जाता,
एक विचार आला मनी,
आईपेक्षा आहे का?
खरचं जवळचा कुणी?

विनाकारण फुलांसाठी,
मी तिच्यावरती भडकलो,
रागारागातच तिला,
भलेबुरे ही बोललो..

माफी मागावया तिची,
मी गाडी तशीच मागे घेतली,
चरणाशी वंदूनी तिच्या,
माफी ही मागितली..

देऊनी "रोझ" तिला तो,
साजरा केला "रोझ डे"
आईपेक्षा प्रिय कोणी?
असते का सांगा तुम्ही गडे !


मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

प्रतिबिंब तुझे


वाहती अश्रू डोळ्यांमधुनी,
प्रतिबिंब तुझे
तरी मिटेना,
काळजाचे तुकडे जाहले,
वेदना जीवाची तुज दिसेना..

कयास केले बहु भुलण्याचे,
चेहरा तुझा तरीही भुलेना,
चुकलो जरी वाट तुझी मी,
ओढ भेटीची तरी मिटेना..

विश्वात रमलो तुझ्या असा की,
अस्तित्व माझे कुठे दिसेना,
जळतो तुझ्याचसाठी निरंतर,
पण किंमत माझी तुला कळेना.

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

नवऱ्याचं पोट*


               *नवऱ्याचं पोट*

काय सांगू तुले माह्या,
बायकोची गोट,
उठता बसता काढते माह्य,
बाहेर निंगेल पोट..

पोटाशिवाय दुसरी राजा,
गोट नाई करत,
किती काही केलं तरी,
मांस नाई झरत..

सकाय संध्याकाय तिले,
एकच असते इचार,
चार चौघात करते माह्या,
पोटाचा प्रचार..

घरा बाहिर पळून म्हणे,
पोट करा कमी,
रातीच्या पोळ्या केल्या,
अर्ध्यापेक्षा कमी,

भात नाई तूप नाई,
सुक सुक देते,
माह्या देखत तुपाची,
धार वरणात घेते..

भाजीपाला खाऊ खाऊ,
वैताग आला मले,
भाईर खायासाठी,
मन माह्य झुरे..

झाकट पळल्या लागते घरात,
रामदेव बाबा,
असा बायकोन माह्यावर,
घेतला ताबा..

हालत ऐकून माह्यावाली,
दोस्त मले हाशे,
असे कशे म्हणे तुये,
उलट पळले पाशे..

वाघ होता म्हणे तू,
शेळी कसा झाला?
आभायातून म्हणे तू,
खाली कसा आला?

लगनाआंदी राजा माई,
बम मजा होती,
भीती बायको नावाची,
अजीबात नोती..

जस वाटलं तस तवा,
खावो राजा मस्त,
अख्खी एक कोंबडी,
म्याच करो फस्त..

दारू चा त लागे मले,
मयनाले खोका,
खाऊन पिऊन होतो म्या,
मस्तवाल बोका.

बायकोनं माही सारी,
मस्ती टाकली जिरून,
खानाऱ्यांच्या तोंडाकडं,
पाह्यतो म्या झुरून..

भाईर खायापेयाची,
मले नाई मुभा,
तोंड पाह्यत पंगतीत असतो,
म्याटासारखा उभा...

लै दिवसान आज,
बायको गेली गावा,
चल खाऊन पिऊन,
ऐश करू भावा..

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

संकल्प आहे तोच, पण उत्साह आहे नवा,

संकल्प आहे तोच, पण उत्साह आहे नवा,
अखंड तेवत राहो, महावितरणचा दिवा..

अंधार फाकवतो, उजेडाचा स्पर्श,
सुखी, समृद्धी अन भरभराटीचं,
जावो नवं वर्ष..

या नवं वर्षात देवाच्या दारी असलेली मागणी.

देवा तुझ्या दारी असा,
भूकंप होऊ दे,
जाती-मत्सर-अविवेकाची,
भिंत कोसळू दे..

नांदो सुखात प्राणी,
भारत देशाचा,
जावो लयाला भेद,
गरिबी-श्रीमंतीचा,
देवा तुझ्या दारी बंधुभाव,
रुजू दे..

निराक्षरांच्या ओंजळी दे,
ज्ञानाच्या ज्योती,
शीलवान करण्या दे तू,
संस्कार मोती..
देवा तुझ्या दारी अज्ञानाचा,
अंत होऊ दे..

स्त्रीलाही पुरुषासम,
मिळू दे सन्मान,
परस्त्री असावी,
मातेसमान..
देवा तुझ्या दारी वासनेचा,
लोप होऊ दे..


सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

ती सध्या काय करते?



ती सध्या काय करते?
यापेक्षा *तो सध्या काय करतो?*
हा प्रश्न मला अधिक सतावतो,
आणि त्याच्या विचाराने,
मग मी दुखावतो..

कारण ही तसंच आहे..

हिरवकंच बहरलेलं झाड,
एकदम सुकावं,
तसं त्याच आयुष्य तिच्या मागे लागून,
बर्बाद झालेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं..

तो हुशार होता,
नुसताच हुशार नाही तर
आमच्या कॉलेजातील,
प्रेमाचा तुषार होता..
दिलदार होता..
दमदार होता,
सोबतच मनाने हळवाही होता..

तो तिच्या प्रेमात पडला,
आणि असा काही पडला,
की नंतर बाहेरच आला नाही..
पार बुडाला होता तो,
तिच्या आकंठ प्रेमात..

अख्ख कॉलेज त्याला,
प्रेमाची मिसाल मानत होतं..
तरुण तरुणी प्रेमासाठी,
त्याची आणाभाका घेत होतं..

प्रेम करावं तर त्या पठ्ठ्यासारखं..
पतंगा होऊन,
आयुष्य खाक करणारं,
साला सब कुछ
तिच्यावर कुर्बान करणारं..

मला ही असंच वाटतं होतं
तेव्हा...

पण बरं झालं मला जमलं नाही..

ज्याच्या आणाभाका पोर पोरी तेव्हा घ्यायचे,
त्याच्यासारख आपण ही करावं,
माझ्याही मनात यायचे.

त्याच अस्तित्वच आज हरवलंय..

तो आता अंधारात कुठंतरी जीवन कुंठत असेल..
आणि आज तर नक्कीच कुणाच्या स्मरणातही नसेल..

पार फिटला तो तिच्यापायी,
वेडावला तो तिच्यापायी..
तिच्याच मागे असायचा,
तिच्याच सेवेत असायचा,
असं वाटायचं कॉलेजला तो,
फक्त तिच्यासाठीच असायचा..

मी ऐकलं,
ती आता सेटल झाली,
पण तो..
तो मेंटल झाला..
त्याचा अतापता नाही,
"लापता" आहे तो तिने नकार दिल्यापासून..

वेळ-पैसा त्यानं पाण्यासारखा
गमावला होता त्यानं,
तिच्या प्रेमात..
नकार मिळाल्यावर देखील,
तसूभर देखील फरक नव्हता,
त्याच्या नित्यनेमात..

हतबलता नैराश्याशिवाय,
काहीच नव्हतं त्याच्या हातात,
जे होते
फॅमिली- दोस्त या,
साऱ्यांपासून तो दुरावला होता,
अन विजनवासात,
कुठेतरी स्थिरावला होता..

मन सुन्न होते,
त्याच्या आठवणींनी,
तो सध्या काय करत असेल?
या विचारांनी..


शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

Bhastachar


_बस !!_
_पुरे झाले आता,_
_भ्रष्टाचार करणाऱ्याच्या,_
_कंबरेत घाला लाथा,_

_भ्रष्ट अधिकारी अन नेत्यांचे,_
 _देशात वाढले प्रस्थ,_
_नागरिक देशाचे,_
_ह्यांचेमुळेच त्रस्त,_

_चित्रपट आले कितीही,_
_दंगल आणि गब्बर,_
_सुधारणार नाहीत हे,_
_फटके दिल्याशिवाय जब्बर,_

_भ्रष्टाचाराच या देशाला_
_लागलं आहे ग्रहण,_
_अजुन किती दिवस त्रास_
 _जनतेने करावा सहन,_

_ह्यांच्यामुळे देशाचा,_
_झुकला आहे माथा,_
_भ्रष्टाचार करणाऱ्याच्या_
_कंबरेत घाला लाथा,_

_भेसळ आणि साठेबाजीचे_
_यांचे गोरखधंदे,_
_उपासमारीने मरतायत,_
_देशातील गोरगरीब बंदे,_

_गरिबी-श्रीमंतीची_
_वाढत आहे दरार,_
_देशाला लुटायचा जणु_
_यांचा पाच वर्षाचा करार,_

_गुणीजनांना देशात माझ्या,_
 _कवडिमोल किंमत,_
_भ्रष्ट नेते अन अधिकाऱ्यांची,_
 _दिवसेंदिवस वाढत आहे हिंमत,_

_शेतकरी इकडे कष्टाने,_
_होत आहे हलाल,_
_बाजारपेठेत श्रीमंत,_
_होत आहेत दलाल_

_देशाच्या विकासाला_
_यांच्यामुळेच बाधा,_
_अहो संपणार  कधी भ्रष्टाचार?_
_हा प्रश्न माझा साधा,_

_भ्रष्ट नेते अन अधिकारी_
_जोवर आहेत या देशात,_
_आम जनतेलाच वाटतं,_
_यावे लागेल त्वेशात,_

_भ्रष्टाचाराच मुळ हे,_
_आमच्यातच आहे लपलं,_
_कारण मतदानाच्या दिवशी_
_मत आम्हीच होतं विकलं_

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

Aaiiii



आज आईचा वाढदिवस त्यानिमित्त खास तिच्यासाठी लिहलेली ही कविता..

काय मागु देवा आता,
उरलेची नाही,
जे जे दिलेस तू,
मला पुरलेची नाही.

असे कोणते मागणे देवा,
तुजकडे मागु,
पुन्हा गरज भासणार नाही,
ज्याने वरदान होईल लागू..

देव हसला अन बोलला,
तुझी एकच मागणी असावी,
मागेल माझी आई जे,
तिची मागणी पूर्ण करावी.

पुन्हा तुला वेगळं काही,
मागावे नाही लागणार,
आयुष्यातील प्रत्येक गोष्ट,
तुझ्या मनाप्रमाणेच घड़णार..

मी विचारलं देवाला,
खरचं अस होईल का?
देव म्हणाला तुझी,
माझ्यावर श्रद्धा नाही का?

आई नेहमीचं मुलांचं,
सुख चिंतित असते,
म्हणूनच तर ती सर्वकाळ,
श्रेष्ठ माझ्यापेक्षा ठरते....
दर दोन तासांनी जेवावं की फक्त दोनदाच जेवावं...यावर केव्हढी ही चर्चा...
पण  दर दोन तासांनी तरी थोडं हसावं...
दर पंच्चावन्न मिनिटांनी कोणाला तरी हसवावं....
असं कोणीच सांगत नाही.

मुळात तुम्ही किती हसता  ....
हसवता...
किती प्रसन्न रहाता,
किती आनंदी रहाता...
हे महत्त्वाचे.
अन्न कसं पचवता
यापेक्षा दुःख कसं पचवता
हे जास्त समजूतदारपणाचे काम....
खाण्यापेक्षा
हसण्यातील प्रोटिन्स महत्त्वाचे.
ते पचवण्यासाठी वेगळा योगा नको...
हसता हसताच ते पचतात.

Ek vichar



_एक विचार सहज आला होता, सहज लिहला..._


एका क्षणी वाटलं,
बायको नावाची जबाबदारी नकोयं,
पण दुसऱ्या क्षणी वाटलं,
बायको नावाचा आधार हवायं..

जबाबदारी म्हणून ती नको असते,
पण आधार म्हणून मात्र ती हवी असते..

एका क्षणाकरिता ती नको असते,
पण असंख्य क्षणांकरिता ती हवी असते..

ती आहे म्हणूनच तर,
एवढा निष्काळजी वागू शकतो मी,
पण या निष्काळजीपणात,
तिची काळजी मात्र,
साफ विसरतोय मी..

खरं तर ती काळजी नसतेच,
ती असते प्रेम, माया, वात्सल्य,
प्रगती, यश, आधार यांनी तुडुंब भरलेलं जलाशय..
जो कधीच आटत नाही,
उलट आपण दुष्काळात असलं की,
तो ओसंडून वाहू लागतो..

बायको म्हणजे,
अवकाशात असंख्य तारका असल्या तरी,
शीतल मायेचा प्रकाश देणारा चंद्र,
बागेत नानाविध फुलांमध्ये,

स्वतंत्र अस्तित्व दरवळवणारा निशीगंध


*तेव्हा_आणि_आज*

एकेकाळी शेती, हिंमत होती,
माणसांची, किंमत होती..

पूर्वजांची, आन होती,
कुटुंबाची, शान होती.

समृद्धीची, सर होती,
आनंदात, भर होती..

शेती तेव्हा, रुबाब होती,
प्रत्येकाचा, ख्वाब होती..

पण,
शेती आता, धसकट आहे,
घरातील, कटकट आहे..

डोळ्यातलं, खुपणं आहे,
मनातलं, दुखणं आहे..

पिकलेलं, पान आहे,
उजाळलेलं, रान आहे..

शेती कर्जाचा, डोंगर आहे,
यातनांच गर्द, जंगल आहे.....

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपला बहुमूल्य ग्रामगीता ग्रंथ शेतकऱ्याला समर्पित करतांना सुरुवातीलाच म्हणतात,

*तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो,*
*सर्वांचे लक्ष तुजकड़े वळो*

त्यांना सुद्धा जाण होती की *शेतकरी जगला तर देश जगेल.* म्हणूनच की काय शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीविषयी ६० वर्षापूर्वीच लिहून ठेवतात. केवढा मोठा दूरदृष्टिकोण. शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय, प्रतिष्ठा मिळायला हवी. पण आजही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असून देखील त्याची उपेक्षाच होत आहे.

_ज्यांना घरात सुद्धा पायात घालायला चपला लागतात, त्यांना रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात मातीचा चिखल अनवानी पायाने तुडवून पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा कशी जाणवनार?_

_घरात साधी झुरळ, उंदिर निघाला तर हातभार उडी मारणाऱ्याला शेतात दबा धरून बसलेल्या सापासमोरून,नांगी टवकारून बसलेल्या विंचवाच्या वाटेतून चालत जाणाऱ्या शेतकऱ्याचे हाल काय समजणार?_

_दरमहा पगार घेणाऱ्या, सुटीच्या दिवसाचे देखील वेतन मिळणाऱ्याला शेतमजुराची मजूरी देण्यात असमर्थ असलेल्या शेतकऱ्याची व्यथा कशी कळणार?_

_उत्पादित मालाला किती नफा मिळेल याची पूर्व गणितीय आकडेवारी जोडणाऱ्या व्यापाऱ्याला, उत्पादकाला, उद्योजकाला उन्हातान्हात घाम गाळुन, रक्ताच पाणी करून पिकवलेल्या शेतमालाला उत्पादन खर्चाएवढा जेंव्हा भाव मिळवता येत नाही त्या शेतकऱ्याची अगतिकता कशी कळणार?_

_हातचा क्रिकेट सामना गमावला म्हणून अतीव दुःख करत बसणाऱ्या तरुण पिढीला कापणीला आलेलं शेतकऱ्याचं पीक अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे हातचं जातंय त्याचं दुःख कस कळणार?_

_नुसते सातबाऱ्यावर नाव चढवून शेतकरी म्हणून मिरवणाऱ्याला  शेतकऱ्याच्या वास्तविक जीवनातील कष्ट कसे कळणार?_

_उन्हाळ्यात कुलर किंवा ए सी मधे बसणाऱ्याला भाजणाऱ्या उन्हात शेतात मजूरी करणाऱ्या शेतकाऱ्याचे दुःख कसे कळणार?_

_टीआरपीच्या मागे लागून क्षुल्लक बातम्या दाखवणाऱ्या  मीडियाला झाडाला लटकून घेतलेले, फवाऱ्याचं औषध प्राशन घेतलेले शेतकरी कसे दिसणार?_

_काहीजण म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांची जरा जास्तच काळजी करता. अर्थव्यवस्थेत सर्व घटक सारखेच असतात. मी म्हणतो होय मी करतोय जास्त काळजी. मला जास्त अर्थव्यवस्था समजत नाही पण जेवढी समजते त्यानुसार अर्थव्यवस्थेत जरी सर्व घटक महत्वाचे असले तरी शेती आणि शेतकऱ्याची तुलना इतर व्यापार उद्दिमांशी केलीच जाऊ शकत नाही. कारण या सर्वांमधे त्याला अत्युच्च स्थान आहे. ज्याप्रमाणे समाजात सर्व नात्यांचे महत्व असले तरी _*आईला विशिष्ठ स्थान आहे अगदी तेच स्थान अर्थव्यवस्थेत इतर व्यापार उद्दीमांत शेती आणि शेतकऱ्याचे आहे.*_

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

Surya



सूर्यही आता मज,
सावली देत आहे,
त्याने पाहिले मी
चटके सोसलेले..

वेदनाही आता मज,
बधिर होत आहे,
त्यांनी पाहिले मी,
घाव सोसलेले..

पाऊसही आता मज,
भिजवत नाही,
त्याने पाहिले मला,
अश्रुंत नाहलेले..

चुकूनही आता मज,
कुणी लुटत नाही,
त्यांनी पाहिले माझे,
लचके तोडलेले..

मरणही आता मज,
कवटाळत नाही,
त्याने पाहिले मी,
मरण जगलेले......

मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...