सोमवार, ३० मार्च, २०२०

कविता



माणसाची ही नेहमीच प्रवृत्ती राहिली की, जोवर स्वतःवर बेतत नाही तोवर त्याचे महत्व कळत नाही, या आशयावर लिहलेली कविता..

आम्ही स्वार्थी लोकं,
मुळीच सुधरणार नाही,
     कुणी कितीही सांगो,
     काळजी घेणार नाही..

स्वतः पडल्याशिवाय,
अनुभव घेत नाही,
     जात आमुची अशी,
     बापाचंही ऐकत नाही..

विनंती करतंय सरकार,
घरात आपल्या रहा,
     काही दिवस तरी,
     सामाजिक अंतर ठेवा..

कितीतरी अपघात,
रोज रस्त्यावर होतात,
     पण चालवणारे त्याच,
     किती मनावर घेतात ?

मरणालाही माणूस,
तोवर भीत नाही,
     जोवर त्याच्यासोबत,
     प्रसंग घडत नाही..

घरात आजार आल्याशिवाय,
कोणी सुधरणार नाही,
     करोनाला गमतीत घेणं,
     तोवर सोडणार नाही..

म्हणून म्हणतो देवा,

प्रत्येक घरात किमान,
सर्दी खोकला होऊ दे,
     प्रत्येकाच्या मनात,
     भीतीचं घर होऊ दे..


रविवार, २९ मार्च, २०२०

समाज



काल मला एक नाटक बघण्याचा योग आला. त्या नाटकातील एक संवाद असा होता,



*समाजाला स्वतःच डोकं नसते, त्याला असतात त्या फक्त भावना........*




मी थोडा खोलवर विचार केला, खरंच असं असते का? तर उत्तर "होय" मिळालं.
समाजाला खरंच स्वतःच डोकं नसतं, असतात तर त्या फक्त भावना..
ज्या वाटेल त्याने भडकाव्यात किंवा त्या भावनेला हात घालून वाटेल तसा उपयोग करून घ्यावा.
समाज म्हटलं की त्यात कुठलीही एक व्यक्ती येत नाही तर येतो तो व्यक्तींचा समूह.
समूह म्हटल्यापेक्षा कळप म्हणने कधीही योग्य राहील; ज्यामध्ये समोरच्याने जिकडे म्हटले तिकडे कुठलाही विचार न करता जाणे.
आजकाल असंच चित्र बघायला मिळतं कुणी भावनांना दुखावतं तर कुणी त्या भावनांना स्पर्श करतयं आणि त्याला प्रतिसाद म्हणून समाज रस्त्यावर उतरतो.




कुण्या एका व्यक्तीला जर रस्त्यावर उतरायला सांगितले तर तो १० वेळा विचार करणार की, आपण जे करतोय किंवा करणार आहो ते चांगले आहे वाईट.. कारण त्याला स्वतःच डोकं असतं, पण समाजाला म्हटला की समाज वाटेल तसा बोटावर नाचवला जाऊ शकतो फक्त भावनेला हात घालायचा असतो.
आणि हो आपल्याकडे बरेचजणांना भावनेसोबत खेळण्यामध्ये *विशारद* प्राप्त झालेले आहे, त्यामुळे कृपया समाजाचा हिस्सा होतांना सावध असावे, आणि आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी.


शुक्रवार, २७ मार्च, २०२०

बिग बॉस सिजन 21 दिवसांचे सुरू आहे..*



*बिग बॉस सिजन 21 दिवसांचे सुरू आहे..*

हात जोडून करते,
विनंती मी सर्वांना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,

बाहेर थैमान घालतो,
भयानक हा करोना..
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,

आम्हा चिमुकल्यांसाठी,
तुम्ही हे करा ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,

झटत आहे सर्व,
सहयोग त्यांना करा ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,

दिवस हे ही असेच,
भुर्रकन निघून जाईल ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना.....

बुधवार, २५ मार्च, २०२०

* मरण पाहिले मी डोळा...* मित्रांनो किमान १५ दिवस आधी माझ्याकडे एक उच्चभ्रू ग्राहक वीज बिलाची तक्रार घेऊन आले. सहज कोरोनाचा विषय निघाला तर त्यांनी सांगितले की त्यांचा भाऊ इटलीमध्ये आहे आणि साक्षात मृत्यु तिथे दरवाजात उभा आहे अशी परिस्थिती तिथे आहे. सर्वांनी घरात स्वतःला २० पेक्षा अधिक दिवसांपासून कैद करून ठेवलेले आहे आणि तेही अनिच्छित कालावधीपर्यंत.. टीव्हीवर बातम्यांमध्ये १००% दाखवत नाही माझा भाऊ आहे म्हणून परिस्थती मला माहिती आहे.. घराबाहेर निघाले का पोलीस उचलून नेतात अशी परिस्थिती तिथे झालेली आहे. आपल्याकडे याहीपेक्षा भयानक परिस्थिती उदभवणार आहे, आपल्या देशातील लोकसंख्या, त्यांच बेशिस्त वागणं हे आपल्याला इतर देशांचा अनुभव असून गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.. मी सुद्धा नेहमी प्रमाणे त्या गोष्टीला तेव्हा लाईटली घेतले, जसे आज आपण घेत आहोत.. पण त्यांनी सांगितलेल्या आज प्रत्येक गोष्टी खऱ्या होत आहे. तो मृत्यूचा थैमान मला डोळ्यांनी दिसत आहे. मित्रांनो हे लाईटली घेणंच आपल्याला महागात पडेल.. आपण करोनावर जोक्स काय केले त्यावरून आपलं या महामारीविषयीच गांभीर्य दिसून येते. जुन्या काळी महामारी यायची तेव्हा लोकांपर्यंत सर्व सोयी नव्हत्या, बिमारीच निदान देखील लागायचं नाही..गावच्या गावं खाली व्हायची.. आज आपल्याकडे सर्वच आहे. एका क्षणात आपल्याकडे सर्व माहिती पोहचते.. पण सर्व असून सुद्धा आपलं लाईटली घेणं, वागणं आपल्याला पर्यायाने सर्व देशाला मृत्यूत ढकलणार आहे. सरकार घरात थांबायला सांगत आहेत, प्रधानमंत्री हात जोडून विनंती करीत आहे कृपया त्यांच्या सुचनांची पायमल्ली करू नका.. पुढील २१ दिवस करोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवणे अतिआवश्यक आहे.. अस म्हणत पडल्याशिवाय शहाणपण येत नाही.. पण सध्या घराबाहेर पडू नका.. इतर देशांपासून अनुभव घेणे आवश्यक आहे.. आज आपण हे २१ दिवस पाळले नाहीत तर अजून कितीतरी अनिश्चित महिने घरात बंदिस्त व्हावे लागेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल.. करोना ही अशी बिमारी आहे की यामध्ये मृत्यू जर झाला तर मयतीला देखील कुणी हजर राहणार नाही.. मला काही होत नाही, भगवंत पाठीशी आहे म्हणून शहाणपण मारू नका. वेळीच सावध व्हा अजूनही वेळ गेलेली नाही..एकाची छोटीशी चूक सर्वांना भारी पडू

बिग बॉस सिजन 21 दिवसांचे सुरू आहे..*



*बिग बॉस सिजन 21 दिवसांचे सुरू आहे..*

हात जोडून करते,
विनंती मी सर्वांना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,
बाहेर थैमान घालतो,
भयानक हा करोना..


मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,
आम्हा चिमुकल्यांसाठी,
तुम्ही हे करा ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,
झटत आहे सर्व,
सहयोग त्यांना करा ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना,
दिवस हे ही असेच,
भुर्रकन निघून जाईल ना,
मी आहे घरात,
तुम्ही पण रहा ना..


गुरुवार, १९ मार्च, २०२०

दोन_गोष्टी


#दोन_गोष्टी

#दोन_गोष्टी

_चित्रपटाचे कथानक उत्तम होते, त्यात अभिनय करणारे अभिनेता व अभिनेत्री दोघेही नवीन असल्याने अभिनयात पाहिजे तेवढा कस नव्हता तरी  कथानकाच्या भरवश्यावर चित्रपट यशस्वी झाला._

#दूसरी...

_चित्रपटाचे कथानक काही खास नव्हते, परंतु अभिनेता आणि अभिनेत्री यांनी त्यांच्या भारदस्त अभिनयाच्या जोरावर चित्रपट यशस्वी झाला._


तात्पर्य

_यातून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे आपण जेथे जन्माला येतो, ते कथानक ( परिस्थिति) सुंदर असेल तरी आयुष्य सुंदर जगता येते._ _कथानक (परिस्थिति) प्रतिकूल असले तरी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर आयुष्य उत्तम जगता येते._
_कथानकाची निवड (जन्म) जरी आपल्या हातात नसली; आयुष्याच कथानक ( परिस्थिति ) सुंदर नसले तरी आपण आपल्या भारदस्त अभिनयाच्या म्हणजेच कर्तुत्वाच्या जोरावर आयुष्याचा चित्रपट यशस्वी करु शकतो. त्यामुळे विपरीत असली तरी आपण जगण्याचा, विजयाचा संघर्ष सोडू नये......

रविवार, १५ मार्च, २०२०

पाणी


चिमुकल्या ह्या रोपांना,
चला पाणी देऊ,
उद्याच्या भारताची,
निव आपण ठेवू..

फुलं फळ देतील,

उद्या हीच रोपे,
आज पाणी देण्याचे,
काम करू सोपे..

शान आहे घरांची,
ही फुलं झाडे,
झोपड्याही दिसतात खुलून,
जणू राजवाडे..

चला निसर्गाची,
राखू निगा सारे,
भरून टाकू श्वासाची,
घरोघरी कोठारे...

सोमवार, ९ मार्च, २०२०

विसावा



थांबुनी थोडा,
तू घे उसासा,
मिठीत माझ्या,
तू घे विसावा...


मिठीत तुझ्या,
देह स्थिजावा,
श्वासात तुझ्या,
श्वास भिनावा..

प्रेमाचा रंग,
असा खुलावा,
इंद्रधनूलाही,
तो लाजवावा..

काळोखातही जो,
चेहरा दिसावा,
तो पौर्णिमेचा,
तू चंद्र व्हावा..

पाहण्यास त्यासी,
जो नित्य झुरावा,
तो झुरणारा,
मी चकोर वहावा..

महिला दिवस



_*हिला* समजून घेतलं की खरा *म"हिला"* दिवस.._

बायका म्हणजे पुरुषांच्या हातातील दुर्दैवी खेळणं ( पण पुरुषच स्वतः खेळणं असल्याच्या आव दाखवतात), सोशल मीडियातून तिच्यावर जोक्स करणं, कंमेंट्स करणं आजकाल सर्व नॉर्मल...
कारण त्या अगदीच बालबुद्धी असतात असा आमचा काहीसा समज..
अरेच्चा चुकलो...
समज नव्हे तर दृढ विश्वासचं..
एकही दिवस असा नसेल की, सोशीलमीडियावर बायकोविषयी जोक्स आम्ही फॉरवर्ड करत नसणार... "हे बायकोवरचे जोक्स म्हणजे आपली बायको सोडून केलेले जोक्स असतात, असं पाठवणारे गृहीत धरतात..
 हे तर असंच झालं की, एखाद्या भारतीयाने म्हणावं, भारतीय मूर्ख आहेत, आणि त्यात आपण नाही अशी समजूत करून घेणे..
त्यामुळे बायकोवर जोक्स करतांना, ते फॉरवर्ड करतांना अनामिक आनंद लग्न झालेल्यांना  आणि न झालेल्यांना सुद्धा असतो.
लग्न न झालेले तर आपण आता आयुष्यात कधी लग्न करणारच नाही अशा अविर्भावात बायकोवरचे मॅसेज पाठवून टिंगल उडवत असतात.
बायको नावाची संज्ञाच आपण चिल्लर करून टाकली आहे. पण ती आई या संज्ञेएवढीच पवित्र आहे हे आपण सर्रास विसरून जात आहोत.
खरं तर बायकाही जास्त दिमाग लावतच नाहीत. कारण त्यांना आपला नवरा हुशार आहे यात समाधान असतं.. घरातील जबाबदारीच ओझं त्यांना दिमाग लावूच देत नाही. 

बर हे आजपासूनच चालू आहे असे नाही.. तर अनंतकाळापासून स्त्रिया-बायकांना दुय्यम स्थान दिले गेले.. 
मनोरंजन आणि भोगवस्तू म्हणून त्यांचेकडे पाहिले गेले..
मुघलांच्या काळात तर भर रस्त्यावरून तिला घरच्यांच्या डोळ्यादेखत उचलून नेले जात होते.. पती मेला की तिने जीवंत सती जावे..
आणि पत्नी गेली तर नवऱ्याने दुसरी बायको करावी..
एका नवऱ्याला एकापेक्षा जास्त पत्नी करायला हरकत नव्हती पण तिने मात्र एकाच नवऱ्यासोबत जगावं आणि मरावं..
मागे झोम्बी कादंबरी वाचली. त्यातील नायिकेला तीने केवळ मुलीला जन्म दिला म्हणून किती यातना सहन कराव्या लागल्या.
वाचणाऱ्याच्या डोळ्यातून त्या पाठीवर बसणाऱ्या चाबकागणिक अश्रू वाहत असतील तर तिने किती खस्ता खालल्या असतील याची अपेक्षाच न केलेली बरी..
केवळ मुलगी आहे म्हणून तिला दूध भात देखील खायला मिळत नव्हता कारण ते सर्व मुलांसाठीच..
आधीपासून चूल आणि मूल ही दरवार्षिक योजना त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये समाजाने इन्स्टॉल केली त्यामुळे त्या एका सीमित कक्षेपलीकडे विचारचं करत नव्हत्या आणि करायला गेल्या तरी पुरुष प्रधान संस्कृती आहेच रोखायला.
ते तेवढं तरी बरं झालं, देशाच्या घटनेने स्त्री पुरुष समानता अधिकार बहाल केला, म्हणून एक महिला देशाची राष्ट्रपतीच नव्हे तर चंद्रावर देखील पाऊल ठेवून आली.
तिला जर संधी दिली तर तिने सिद्ध करून दाखविले आहे की ती पुरुषांपेक्षा काकणभर जास्तच सरस आहे..
पण आम्ही पुरुष.. 
मुलींनी घरी किती वाजता यावं, त्यांनी काय घालावं, काय बोलावं, कसं वागावं यावर निर्बंध घालून त्यांना त्यांना आवर घालू..
आजही ज्या घरात बहीण भाऊ आहे तिथे जेवण झाल्यावर भावाचे ताट बहिणीनेच उचलावे व धुवावे अशी प्रथा आहे..
निसर्गाचा नियम आहे की एखाद्या रोपट्याला हवा, पाणी आणि ऊन योग्य प्रमाणात मिळाले नाही तर त्या रोपट्याची हवी त्या प्रमाणात वाढ होत नाही.

पती जेंव्हा हिम्मत हारतो तेंव्हा हिम्मत देणारी पत्नीच असते. स्वतःची जन्मजात ओळख पतीबरोबर त्याची जीवनसंगिणी होऊन मिटवून टाकते. आजारपणात पुरुष महिलांची जी सेवा करत नसेल ती सेवा आईनंतर केवळ एक पत्नीचं करू शकते. मुलांना संस्कार देण्याचे काम सुद्धा तीच करते.
आणि आम्ही म्हणतो,
ती कुठे काय करते?

खरं तर आज,
महिला दिवस,
*वूमन डे*
ज्यांचं *मन* हे कधीच स्वतःचा विचार करत नाही अशा त्या *वुमन*
त्यांचं *मन* जिंकता आलं तर खरा *वुमन डे*

आई असते तेव्हा लेकरांचा, बहीण असते तेंव्हा भावाचा,
पत्नी असते तेंव्हा पतीचा विचार करते..
ती आयुष्यभर नेहमी दुसऱ्याचाचं विचार करते. म्हणून ती श्रेष्ठ ठरते पुरुषांपेक्षाही...

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी तर ग्रामगीतेमध्ये महिलांविषयी एक स्वतंत्र अध्यायच लिहला,
 ते म्हणतात,


विद्यागुरुहुनि थोर । आदर्श मातेचे उपकार।।
गर्भापासुनी तिचे संस्कार । बालकावरि ।।

'जिच्या हाती पाळण्याची दोरी ।
तीच  जगाते  उद्धरी '।
ऐसी  वर्णिली  मातेची  थोरी ।
शेकडो  गुरुहूनिहि ।।

मातेच्या  स्वभावे  पुत्राची  घडण ।
त्यास  उज्वल  ठेवी  तिचे  वर्तन ।
स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचे मोठेपण ।
ऐसे  आहे ।।

म्हणती  जरि  बाप  तैसा  लेक ।
परि  माउलीचे  महत्व  अधिक ।
मातृशक्तीनेच वाढती सकळिक  ।
मुले  चारित्र्याने ।।
        
स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरगिणी नाही ।
स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ।।

मुलीने सदा लपोनि राहावे । मुलाने गावी रागरंग पाहावे ।
ऐसे हे दृष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हा ।।

जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना ।
आपुल्या सुखदुखाच्या भावना । प्रकटवाव्या सभा-संमेलनी ।।

स्त्री-पुरुष ही दोन चाके । जरी परस्पर सहायके ।
तरीच संसार - रथ चाले कौतुके । ग्राम होई आदर्श ।।

आज मी तुमच्यासोबत केवळ एका महिलेमुळे आहे. कधी ती आई, कधी बहीण, मैत्रीण तर कधी पत्नी म्हणून कुठल्या ना कुठल्या नात्यातून आपल्यासोबत असते.
म्हणून आई या प्रमाणे बहीण, मैत्रीण, पत्नी यांचा देखील सन्मान व्हावा हीच अपेक्षा.

समाजी जो पुरुषांशी आदर,
तैसाचि महिलांशी असावा व्यवहार।
किंबहुना अधिक त्यांचा विचार,
व्हावा समाजी ।।


गुरुवार, ५ मार्च, २०२०

रील लाईफ प्रमाणेच रियल लाईफ मध्ये भावना जोपासली पाहिजे


*रील लाईफ प्रमाणेच रियल लाईफ मध्ये भावना जोपासली पाहिजे*

_गरीबांच्या जीवावरच श्रीमंत झाल्याची बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत परंतु त्या गरिबांची स्थिति मात्र जैसे थे._
_कुलीची भूमिका साकारणारा अमिताभ बच्चन घ्या, मेरी जंग मधील अनिल कपूर घ्या किंवा अवतार मधील राजेश खन्ना असो._
_यांनी सुरुवातीला जी गरीब वर्गातील व्यक्तिरेखा साकारली त्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले व त्याच्या बळावरच ही मंडळी सुपरस्टार झाली._
_आजही कुपोषित मुलांच्या, भिक मागणाऱ्या मुलांच्या, डोक्यावरून कोसन् कोस पाणी वाहून आणणाऱ्या महिलांच्या फोटोला चित्रप्रदर्शनीत प्रथम पारितोषिक मिळते, भली मोठी रक्कम मिळते._
_याच कारण आपल्यातील भावना अजुन मेलेल्या नाही. ते दुःख आपल्या डोळ्यासमोर येते व आपण पटकन कुठलाही विचार न करता त्या कलाकाराला, फ़ोटोग्राफीला दाद देतो. पण त्या कुलीचे, कुपोषित-भिक मागणाऱ्या मुलाचे, किंवा त्या कोसन् कोस डोक्यावरून पाणी वाहून आणणाऱ्या महिलेच्या वास्तविक आयुष्यात कुठलाही फरक पड़त नाही उलट त्यांच्या आयुष्यावर कलाकृती सादर करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यात प्रगतीचा एक तुरा रोवला जातो._
_याला कारणीभुत आपणच आहोत. चित्रपटगृहात गेलो की आपण भावनिक होतो व प्रत्यक्ष जीवनात मात्र आपण त्या भावना जोपासत नाही. म्हणून मेरी कोम ने आयुष्यात जेवढी कमाई केली नाही त्यापेक्षा किती तरी पट दिग्दर्शक आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा ने मेरी कोमच्या जीवनावर चित्रपट बनवून कमविले._
_वास्तविक आपण दाद त्या कलाकराला नाही तर त्या कुलीच्या, मेरिकोमच्या संघर्षाला देतो. त्या कुपोषित मुलाच्या, भिक मागणाऱ्या मुलाच्या फ़ोटोला बघताच आपण भावनिक होतो._
_असे बरेच कुली, महिला, मुले आजही आपल्या आजुबाजुला आहेत पण त्यांना कुठलीही मदत देण्यास आपण तयार नसतो._
_हे फक्त एक उदाहरण आहे अशा बऱ्याच बाबी आहेत. आपण केवळ रील लाइफ मधे भावनिक न होता रियल लाइफ मधे देखील आपली भावनिकता जोपासली पाहिजे._


मी उद्योजक होणार

  मी उद्योजक होणार  ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना  महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्...